

Bhatsa Dam Gates Opened
शहापूर : भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २५) दुपारी १ वाजता भातसा धरणाचे पाचही वक्रद्वार ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, भातसा नदीपात्रात ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक ) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणाची पाणीपातळी सकाळी ११.५० वाजता १३७.६६ मीटर इतकी नोंदविण्यात आली. जलग्रहण तसेच लाभ क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाढत्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर भातसा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः शहापूर–मुरबाड मार्गावरील सापगाव पुलासह नदीकाठच्या सर्व गावांतील सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी नागरिकांना नदीच्या वाढत्या पाणीपातळीची तातडीने माहिती देऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात किंवा वाहत्या पाण्यात उतरू नये, पूरग्रस्त ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.