डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यातील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले असताना आता अभिनेता श्रेयस राजे यानेही खड्ड्यांमुळे होणाऱ्या मनस्तापावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचा इतका ताप झाला आहे की, आर्धी गाडीच खड्ड्यात जाऊन अडकते, असे त्याने म्हटले आहे.
अभिनेता श्रेयस राजे हा सध्या 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत काम करत आहे. भिवंडी येथे राहत असलेल्या श्रेयसला रोज घोडबंदर किंवा मीरारोड येथील स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यासाठी जावे लागते. तो रोज भिवंडी, घोडबंदर, मिरा रोड असा प्रवास करतो. त्यामुळे जवळपास रोजच त्याला १ ते १.३० तास ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. मुळातच रस्त्यांमध्ये खड्डे असल्याने हे ट्रॅफिक अधिक वाढत असल्याचे सांगतानाच त्याने जर एखादी रुग्णवाहिका आली. तर तिला सुद्धा या ट्रॅफिकमधून वाट काढणे अशक्य असते, असेही त्याने नमूद केले आहे.
आपण महासत्ता बनायचे, स्वप्न पाहात आहोत, तर दळणवळणाची सुविधा चांगली हवी, हे सांगतानाच त्यांनी काय झाडी, काय डोंगर अन् काय हाटील, हे सगळं करून झालं असेल. तर रस्त्याकडे लक्ष द्या, असे त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. तसेच बेसिक गोष्टींचा पत्ता नाही नि देश महासत्ता होण्याच्या तयारीत असल्याचे देखील त्याने त्याचा पोस्टमध्ये नमूद करत रोजच्या जीवनातील सामन्यांच्या अडचणींवर भाष्य केले आहे.
हेही वाचलंत का ?