Barvi Dam Overflow : ठाणे जिल्ह्याचे पुढील वर्षभराचे पाण्याचे टेन्शन संपले
बदलापूर : पंकज साताळकर
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण आज (शुक्रवार) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. बारवी धरणात सध्या 339.56 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. बारवी धरणाची उंची 72.60 मीटर इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणावरील अकरा स्वयंचलित दरवाजांच्या वाटे 140 क्यूसेक पाणी ओसंडून वाहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरले. त्यामुळे पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट टळणार आहे. कारण यंदा जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यामुळे ही या धरणात 29% इतका पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र तरीही पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यात पाणी कपात लागू केली नव्हती. त्यामुळे पावसाला अजून दोन महिने शिल्लक असतानाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा सध्या बारवी धरणात उपलब्ध झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर या महानगरपालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला आहे.
नदी काठच्या गावांना एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा...
बारवी नदीकाठी असलेल्या गावांना बारवी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी पाण्यात जाऊ नये तसेच या ठिकाणी पर्यटकांना देखील पाण्यात जाण्यास मज्जाव करावा अश्या सूचना एमआयडीसी प्रशासनाने स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाला दिल्या आहेत.

