बदलापूर, पुढारी वृत्तसेवा : Thane Heavy Rains : दुथडी भरून वाहणाऱ्या उल्हास नदीचा रुद्र आवतार बदलापूरकरांनी अनुभवल्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. 2019 साली रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे बदलापूर आणि वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. त्यामुळे सतर्कतेची भूमिका घेत मध्य रेल्वे प्रशासनाच्या पुणे विभागाने मुंबई आणि पुणे या दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन आणि इंटरसिटी या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गुरुवारी रद्द केल्या आहेत. तर शुक्रवारीच्या पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस ही रद्द करण्यात आसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
लोणावळा आणि कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बदलापूर मॅरेज बंधारा येथील उल्हास नदीची संध्याकाळी 5 वाजताची पातळी 18.80 मीटर इतकी होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा एक मीटर होऊन अधिक आहे.
बदलापुरातील उल्हास नदीची धोक्याची पातळी ही 17.50 मीटर इतकी असून बदलापूर शहराच्या सखल भागात संध्याकाळपर्यंत पाणी ओसरले नव्हते. मुंबई- पुणे कडे जाणाऱ्या एक्सप्रेस रद्द केल्या असल्या तरी लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल ट्रेन मात्र सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त ट्रॅकमन, गँगमन आणि पॉइंटमेंट रेल्वे रुळांवर तैनात केले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास हा मार्ग बंद केला जाऊ शकतो. मात्र सध्या गाड्यांचा वेग हा कमी करून या मार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने होत आहे. (Thane Heavy Rains)