ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात असताना फ्री वेजवळ त्यांच्या कारवर काही कार्यकर्त्यांनी आज (दि.१) सायंकाळी पावणे चारच्या सुमारास हल्ला केला. कारची काच फुटली आहे. हा हल्ला छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे हे कार्येकर्त्यानी केल्याचे बोलले जात आहे. (Jitendra Awhad Car Attack)
विशाळगडावरील आंदोलनंतर संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणण्याचा अधिकार नाही, असे विधान आव्हाडांनी केले होते. त्यामुळे स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली होती. आज त्याच्यावर हल्ला झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Jitendra Awhad Car Attack)
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील निवासस्थानी निघाले होते. त्यांची गाडी फ्री वे जवळ वाहतूक कोंडीत अडकली असता दुसऱ्या कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आव्हाडांची कार वेगाने पुढे गेली म्हणून ते बचावले. ते सुखरूप ठाण्यातील घरी पोहचले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कारच्या मागे पोलिसांची गाडी होती. हल्ल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचे घर गाठले आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता आव्हाड यांची गाडीवर हल्ला झाला.