ठाणे : दुसर्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, शिवसेना पक्ष कुणी चोरला? ठाण्यात या आशयाचे लावण्यात आलेले बॅनर्स सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या बॅनर्सच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या थेट जनतेच्याच न्यायालयात या बॅनर्सच्या माध्यमातून दाद मागितल्याने ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटाच्या हिंदुत्वावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मातोश्री, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून या समीकरणाला डाग लावण्याचे काम शिंदे गट करत असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे.
आता तर शिवसेना पक्ष कुणी चोरला असा थेट सवाल केदार दिघे यांनी जनतेच्या न्यायालयात विचारला आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत ठाणेकर जनता गद्दारांचा हिशेब करणार असून दुसर्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही या शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीका केली. या बॅनरची सर्वत्र ठाण्यात चर्चा असून 9820055066 या व्हाट्सअप नंबरवर ठाणेकरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बॅनरबाजीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केदार दिघे यांनी केला आहे.