

ठाणे : नीट पेपरफुटीनंतर उसळलेल्या जेन झी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आणि उबाठा-मनसेच्या भूमिकेवर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे बंधूंची भूमिका 'दुटप्पी' असल्याचा आरोप करीत उबाठा आणि मनसे हे पक्ष बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, असा टोला लगावला.
ठाण्यातील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री शेलार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत केंद्र सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पेपर लीक प्रकरणात केंद्र सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून, संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सीबीआयकडूनही कारवाई आणि छापे टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तातडीने पावले उचलली. शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये म्हणून वेळेत निकाल जाहीर करण्यात आला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कायदे करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशीलपणे काम करत असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत, त्यांच्यापेक्षा आमचा वडापाववाला प्रामाणिक आहे, अशी टीका केली. तसेच मराठी-अमराठीचा मुद्दा उपस्थित करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काहीजण करत आहेत. तरीही विद्यार्थ्यांच्या करिअरशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा पुनरुच्चार मंत्री शेलार यांनी केला.