ठाणे : महाराष्ट्रातील भक्तांना आता पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. विठूरायाच्या भक्तांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१३ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व आगारातून पंढरपूरकरिता जादा बसेस सोडण्यात येणार असून १७ते २२ जुलैदरम्यान पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाची वाहतूक सुरू राहाणार आहे. या जादा बसेसद्वारे प्रवासासाठी आरक्षणाचीही सोय उपलब्ध आहे. जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली (नॅन्सी कॉलनी) स्थानकातून १३ जुलैपासून ही जादा वाहतूक सुरू होणार आहे. १७ते २२ जुलै दरम्यान पंढरपूरमध्ये चंद्रभागा बस स्थानका तून परतीच्या प्रवासाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय भिवंडीवरून १६ व १७ जुलै रोजी सकाळी ६ वा. इंदापूर-पुणे मार्गे बस सुटेल. १६ रोजी सकाळी ७ वा. माळशेजमार्गे पंढरपूरसाठी बस आहे. भिवंडी, कल्याण, फलटणमार्गे पंढरपूरला जाण्यासाठी १६ रोजी सकाळी ८.३० ला बस आहे.
शहापूर येथून १६ व १७ रोजी सकाळी ७.३० व तिन्ही दिवस सकाळी ८ वाजता पंढरपूर बस सोडण्यात येणार आहे. मुरबाडवरून तिन्ही दिवस सकाळी ७ वा. बदलापूर, कर्जत मार्गे पंढरपूर साठी बस सुटेल. विठ्ठलवाडी आगारातून अंबरनाथ बदलापूर, पनवेलमार्गे १६ व १७ जुलै रोजी सकाळी ८ वा. जादा बस सुटेल. वाड्यातून कल्याण, माळशेज मार्गे रोज सकाळी ६.३० वा. सकाळी ८ सायंकाळी ६ वा. बस सोडण्यात येईल.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकरिता ठाणे विभागातून ४६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना अमृत योजनेचा तर माहिला सन्मान योजनाचा लाभ घेता येणार असून या बसेसचे आरक्षण करता येणार आहे.
-विलास राठोड, विभाग नियंत्रक ठाणे विभाग, एस. टी. महामंडळ.