दीपक गायकवाड - खोडाळा
मध्य वैतरणा धरणांतून कोणतीही पुर्वसुचना न देता अवचित मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे येथील लोखंडी सांगाड्यावरुन एक व्यक्ती शनिवारी (दि.8) वाहून गेला. भास्कर नाथा पादीर (वय.40) वाहून गेले. तर याबरोबरच रुचिका पवार ही आठ वर्षाची मुलगी वाहुन जात होती. तिला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे. भास्कर पादीर यांचा सावर्डे येथील ग्रामस्थ कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि 6) रात्री उशीरा पर्यंत मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग करण्यात आला नव्हता. मात्र शनिवार संध्याकाळ च्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सुचना न देता अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेला आहे. काही लोक संध्याकाळी कामाहून शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथे गावी परतत असतात.मात्र येथील धोकादायक पुलाच्या दुतर्फा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही.
मध्य वैतरणा धरण परिसरात पर्यटकांचा बुडून मृत्यू होणे या लगतच्या काळातील ताज्या घटना आहेत. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील एका पर्यटक तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी आणि स्थानिक पोलिसांनी शिकस्तीने मृतदेह शोधला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे ही महापालिकेची व शासनाची जबाबदारी आहे. सातत्याने घडत असलेली जीवित हानी लक्षात घेऊन खास अत्यावश्यक बाब म्हणून मध्य वैतरणा येथे कायम जीव रक्षक दल तैनात करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.