दिल्लीत मराठी माणसाचा आवाज बुलंद करा; राज ठाकरेंचा म्हस्केंना सल्ला

राज ठाकरे
राज ठाकरे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी आपण दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे, याची आठवण ठाकरे यांनी म्हस्के यांना करून दिली.

ठाणे लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचा सव्वादोन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला. या विजयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचाही वाटा असल्याने म्हस्के यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना म्हस्के म्हणाले, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज ठाकरे यांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली. त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. ते मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू, असे वचन त्यांना दिल्याचे खासदार म्हस्के यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news