मोबाईल चोरट्याचा एक फटका..अन् लोकलमधून खाली पडल्‍याने तरूणाने गमावले दोन्ही पाय | पुढारी

मोबाईल चोरट्याचा एक फटका..अन् लोकलमधून खाली पडल्‍याने तरूणाने गमावले दोन्ही पाय

ठाणे : पुढारी वृत्तसेवा  “माझ्या हातावर काठीचा फटका पडला आणि मी लोकलमधून खाली पडलो. माझ्यासोबत काय घडलं आहे ते काही काळ मला समजलचं नाही. मी वाचवा वाचवा ओरडत होतो, लोक मदतीला आले आणि मला रुग्णालयात दाखल केलं. पायावरून लोकल गेली आणि दोन्ही पाय गमावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यापुढे मी कधीच उभा सुध्दा राहू शकत नाही.” अशी खंत एका (31 वर्षीय) तरुणाने व्यक्त केली.

जगन लक्ष्मण जंगले या प्रवाशाच्या हातावर गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलमधून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथील रहिवासी आहेत. तीन महिन्यांपूर्वीच जगन यांचे लग्न झाले. नेहमीप्रमाणे जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली. ठाणे स्थानक सोडल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला.

यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले.

या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाइल कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

जगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची, तसेच रुग्णालयीन खर्च व रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी

– प्रशांत शिंदे , नातेवाईक

 

अशा परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे असते. हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याला 3 ते 4 बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यांनतर आमची टीम त्याची प्रकृती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होती. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले असून यापुढे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च आहे.

-डॉ. बाबासाहेब चव्हाण (अस्थिरोग तज्ञ, हायलँड हॉस्पिटल)

Back to top button