Lok Sabha Election 2024 : ठाणे, कल्याण अखेर शिवसेनेलाच!; पालघर भाजपला
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे आणि कल्याण या जागा शिवसेनेला देऊन पालघर भाजपकडे आणण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा कायम आहे. शनिवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपला देण्याचा निर्णय जवळपास झाला होता. पण उदय सामंत यांनी पुन्हा या जागेचा आग्रह धरल्याने या जागेचा तिढा कायम राहिला आहे. ( Lok Sabha Election 2024 )
संबंधित बातम्या
- उजनीतील पाणीसाठा तळाकडे; पिण्याच्या पाण्यासह शेतीपिकांचा प्रश्न गंभीर
- पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; जेजुरीत महिलांचा आक्रोश
- Ravi Rana join BJP : नवनीत राणांपाठोपाठ रवी राणा देखील भाजपमध्ये प्रवेश करणार?
शनिवारी ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग भाजपकडे देण्याचा निर्णय झाला होता. मात्र उदय सामंत यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यानंतर पुन्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विषय अनिर्णीत राहिला आहे. मात्र ठाणे, पालघरमधील मतदारसंघांसंदर्भात ठाण्याच्या दोन जागा शिवसेनेला, तर पालघरची जागा भाजपला आणण्यावर एकमत झाले आहे.
डॉ. राजेंद गावितांना विरोध
डॉ. राजेंद गावित हे पालघरचे विद्यमान खासदार आहेत. ते मूळचे भाजपचे आहेत. 2019 मध्ये ही जागा शिवसेनेकडे गेल्याने उमेदवारीसाठी ते शिवसेनेत गेले होते. मात्र आता ते भाजपत पुन्हा येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होत असल्याने याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसर्या बाजूला बहुजन विकास आघाडीने भाजपने विश्वासात न घेतल्यास बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना लोकसभेला उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीनेही अद्याप या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. या सार्या पार्श्वभूमीवर पालघर ठाणे मतदारसंघातील उमेदवारांबाबत अद्यापही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक
ठाण्याचा मतदारसंघ शिवसेनेकडे आल्याने रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक या दोन नावांवर चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उभे न राहिल्यास माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नावाबाबतही चर्चा सुरू आहे. ( Lok Sabha Election 2024 ) Lok Sabha Election 2024