Lok Sabha Election 2024 : भाजपला जागा सुटल्यास ठाणे लोकसभेचे ’कल्याण’ होणार? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपला जागा सुटल्यास ठाणे लोकसभेचे ’कल्याण’ होणार?

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ;  शिवसेना ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांना तिसर्‍यांदा ठाणे लोकसभेची उमेदवारी दिली असून महायुतीमधील तिढा अजूनही सुटलेला नाही. अशा राजकीय परिस्थितीत शिंदे गटाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ठाण्याचे कल्याण होणार असे सूचक वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ठाण्याची जागा भाजपाला सोडली अथवा शिवसेनेला तर दोन्ही पक्षांमधील नाराजीचा फटका युतीच्या उमेदवाराला बसणार तर नाही ना ? अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. ( Lok Sabha Election 2024 )

ठाणे लोकसभा मतदार संघावरील दावा शिवसेना शिंदे गट आणि भाजपने कायम ठेवल्याने महायुतीमधील तिढा अजून सुटलेला नाही. मात्र प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठी महायुतीचे नेते कामाला लागले असताना विधानसभेची गणित लक्षात घेऊन जागा वाटपाचा तिढा सुटेनासा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि उमेदवारी पुन्हा मिळेल या वचनावर 13 खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या उठावाला बळ दिले. असे असताना शिंदे गटाच्या खासदारांना उमेदवारी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. किमान पाच ते सहा खासदारांना तिकीट मिळणार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नाशिकच तिकीट खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी राष्ट्रवादी अथवा भाजपला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातार्‍याची जागा सोडण्यात आली. तशीच ठाण्याची जागाही भाजपाला सोडावी, अशी मागणी जोर धरत असताना शिंदे गटाने ठाण्यावरील दावा कायम ठेवल्याने तिढा वाढलेला आहे. कल्याणमधून खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे लढणार असून त्यांना स्थानिक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी विरोध करीत पाडण्याची भाषा केली आहे. अशा परिस्थतीत ठाण्याची जागा भाजपाला सोडण्यात आली तर नाराजीची फायदा ठाकरे गटाचे राजन विचारे यांना होऊ शकतो, अशी भीतीही युतीच्या नेत्यांना वाटत आहे. शिवसेनेचे विचारे यांनी नगरसेवकांपासून महापौर, आमदार आणि दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकून राजकीय पटलावर आपला ठसा उमटविला आहे. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button