![ठाणे : पावसामुळे कसारा रेल्वे प्रवाशांचे हाल! वासिंद-कसारा स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2FKasara-Railwaiy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कसारा; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे कल्याण कसारा रेल्वे यंत्रणेवर झालेल्या परिणामामुळे हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. आज (दि. २७) सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने त्याचा परिणाम रेल्वे यंत्रणेवर झाला आहे.
आज (दि. २७) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास वासिंद रेल्वे स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाराकडे येणारी वाहतूक तब्बल दीड तास खोळबली होती. सिग्नल यंत्रणा साडे आठच्या सुमारास पूर्ववत झाली. त्यामुळे तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरु झाली. वासिंद ते टिटवाळा दरम्यान अडकलेल्या मेल एक्सप्रेस, कसारा, आसनगाव लोकल मार्गस्त झाल्या. त्याच दरम्यान मुसळधार पावसामुळे खर्डी कसारा दरम्यान पोल नंबर १०९ जवळ रेल्वे रुळावर दरड, माती कोसळल्याने ८ वाजून ५० मिनिटांनी कसाराकडे येणारी रेल्वे वाहतूक पुन्हा ठप्प झाली.
रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ट्रॅक वरील माती व दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर रेल्वे ट्रॅक वरील मलबा हटवण्यात आला. कसाराकडे येणारी वाहतूक सुरु करण्यात आली या दरम्यान कसाराकडे येणारी एक लोकल आसनगाव रेल्वे स्थानकात रद्द करण्यात आली होती.
कसारा लोकल, पंचवटी, राज्यरांनी, विदर्भ एक्सप्रेस, असनगाव लोकल विविध रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान संध्याकाळी ६.३० पासून रात्री १०.४० पर्यंत प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. या दरम्यान महिला, लहान मुले, वयोवृद्ध प्रवाशाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
दरम्यान दोन-दोन तास लोकल पुढे जात नसल्याने, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये असलेल्या चाकर मानी प्रवाशांनी भर पावसांत व अंधारात महामार्ग गाठून मिळेल त्या वाहनाने घर गाठले. दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात ७ वाजेपासून उभे असलेले मुबईकर प्रवशा ना रात्री ९.४० वाजता लखनऊ वरून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मधून कल्याणकडे रवाना केले यावेळी या एक्सप्रेसला कल्याण पर्यंत सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला होता.
दरम्यान पावसाळा सुरु होण्या अगोदर.रेल्वे प्रशासनाने आवश्यक ती सिग्नल दुरुस्ती. मेंटेनस व ट्रॅक लगत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पहिल्याच पावसात प्रवाशांना ४ तास रेल्वेत अडकावे लागले. हे निषेधार्त असल्याची प्रतिक्रिया प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.