महाराष्ट्र बंद : भाजपची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव ! | पुढारी

महाराष्ट्र बंद : भाजपची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव !

ठाणे; पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात भाजपच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रम, गरबा तसेच विविध हिंदू सणांमध्ये गर्दीच्या नावाखाली निर्बंध घालत आहेत. महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेकांनी करोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. नागरिकांना वेठीस धरणे, मालमत्तेस हानी पोहोचवणे, नागरिकांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणे, बंदमध्ये झालेल्या मालमत्तेचे नुकसान व जनतेला झालेल्या त्रासा निमित्त माननीय उच्च न्यायालयाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीला दंड आकारावा अशी विनंती केली आहे.

या सर्व प्रकारामुळे भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी ही याचिका उच्च न्यायालयाचे वकील अॅड. प्रितेश बुरड यांनी दाखल केली आहे.

सोमवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंद पुकारला. त्याचा थेट परिणाम व्यापार उद्योगांवर झाला. अनेक ठिकाणी जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक वस्तूंची दुकानेही महाविकास आघाडीच्या बंद केली. काही ठिकाणी दुकानांमध्ये शिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठी धमकावण्यात आले.

ठाण्यातही रिक्षा चालक प्रवाशांना घेऊन जात असताना शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. या बंदमध्ये शासकीय बसगाड्याही बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकात बसगाड्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.

हे ही वाचलं का?

Back to top button