पालघर : वसई तालुक्यातील भारोळ गावातील आदिवासी विद्यार्थ्याने शाळेतून परतीच्या प्रवासादरम्यान टेम्पो चालक गाडी थांबवत नसल्याने भीती निर्माण झाल्याने धावत्या टेंपोमधूनच उडी मारल्याची घटना घडली आहे.
विद्यार्थ्याने धावत्या टेंपोमधूनच उडी मारल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. यश जाबर (वय 14) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता नववी या वर्गात शिकत आहे. यश जाबर याला उपचारासाठी सिलवासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यश शाळेतून घरी परतत असताना टेम्पोमध्ये मागे बसला होता. मात्र त्याच्या गावाच्या ठिकाणी उतरायचे असताना चालकाला थांबण्यास सांगून गाडी थांबवत नाही म्हणून तो घाबरला आणि त्याने धावत्या वाहनातून उडी मारली.
शिक्षकांना वेतन देण्यासाठी वसई तालुक्यातील भारोळ गावातील जिल्हा परिषद शाळेचे नववी-दहावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. शाळेतील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे समायोजन आठ किलोमीटर अंतरावरील खानिवडे आणि 14 किलोमीटर अंतरावरील चांदीप येथील शाळेत करण्यात आले आहे. दूरच्या अंतरावरील शाळेत प्रवास करताना विद्यार्थ्यांना महामार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर जिल्हा परिषदने जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू केलेले नववी-दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना महामार्गावरून प्रवासा करावा लागत असल्यामुळे फटका बसत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी भानुदास पालवे यांच्या वर्ग बंदच्या निर्णयाबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि शिक्षण सभापती पंकज कोरे माहिती नसल्याचे समोर आले होते. माहिती दिल्यानंतर जिल्हा परिषदेने बंद केलेले वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वर्ग सुरू करण्यात झाले नाहीत.
पालघर जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभारामुळे धोकादायक प्रवास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश भुरकुंड यांनी केला आहे. दरम्यान तत्काळ वर्ग सुरू करून जिल्हा परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असेही म्हटले आहे.