

सोलापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाडक्या बहिणींना बिनव्याजी पाच लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाच्या लखपती दीदी या योजनेंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात येणार असून त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसायही सुरू करता यावा व त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.
लाडक्या बहिणींना लखपती करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पाच लाखांच्या अर्थसहाय्यातून लघु व्यवसाय थाटता येतो. शिवाय, ही योजना सरकार आपल्याच स्तरावरून राबवणार आहे. ही योजना राबवताना दुर्बल घटकातील अर्जदार महिलांनी प्रस्तावाच्या सोबत सादर केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे केली जाणार आहे. या पडताळणीने गरजूला लाभ मिळण्यात अडचणी येणार नाहीत.
तसेच अर्जदार महिलांना त्यांनी प्रस्तावित केलेल्या व्यवसायानुसार तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारातील परिस्थितीसह अन्य सविस्तर माहिती देण्यात येईल. अर्जदार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
किमान वय
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुर्बल घटकातील महिलाच अर्ज करू शकतात. ती राज्याची रहिवासी असावी. लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थ्याचे किमान वय 18, तर कमाल वय 50 वर्ष असावे. लाभार्थी महिला बचत गटाशी संबंधित असणेही गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या पडताळणीनंतर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल.