

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकऱ्यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी नऊ कोटी ९२ लाख रुपयांचे दान केले. याबरोबरच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुमारे चार लाख ९५ हजार २२, तर मुखदर्शन सुमारे पाच लाख ४२ हजार वारकऱ्यांनी घेतले. त्याचबरोबर कळस दर्शन घेत सुमारे ३२ लाख वारकऱ्यांनी आषाढी यात्रेत हजेरी लावली. या भाविकांकडून विठ्ठल-रुक्मिणी चरणी दान करण्यात आले आहे. यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या.
आषाढ शुद्ध एक (दि. १५) ते आषाढ शुद्ध १५ (दि. २९) या कालावधीत वारकऱ्यांनी श्रींच्या चरणाजवळ ७१ लाख ४४ हजार ७८ रुपये अर्पण केले आहेत. २ कोटी ९३ लाख ९७ हजार ७६ रुपये देणगी, ८३ लाख ४७ हजार लाडू प्रसाद विक्री, ४६ लाख ३१ हजार १०३ रुपये भक्तनिवास, २ कोटी ४० लाख ३२ हजार ४०२ रुपये हुंडीपेटी, १५ लाख २७ हजार ४४३ रुपये परिवार देवता तसेच ९६ लाख ७२ हजार ९३७ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ४५ लाख २० हजार ४३९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले.