पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रा एकादशी सोहळ्याचे वेध भाविकांना लागले आहेत. यातच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू आहे. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराला 700 वर्षांपूर्वीच मूळ रूप प्राप्त करून देण्यात येत आहे. विठ्ठल व रुक्मिणी गाभारा, चार खांबी, सोळखांबी येथील कामे पूर्ण झाली आहेत. किरकोळ कामे वगळता पहिल्या टप्प्यातील कामे 30 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मूळ रूप पाहता येणार आहे. आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने मंदिर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्याअनुषंगाने मंदिर समितीकडून कामे सुरु आहेत.
श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामाला पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने 74 कोटींचा निधी दिला. हे काम गेल्या 15 मार्च पासून सुरु आहे. विठ्ठल व रुक्मिणी गाभार्यातील काम पुर्ण झाल्याने 2 जून पासून श्री विठ्ठल व रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरु करण्यात आले. सव्वा तीन महिन्यानंतर चारखांबी, सोळखांबी येथील काम पुर्ण झाले आहे. मंदिरातील 80 टक्के कामे पुर्ण झाली आहेत. सद्या कामाला गती देण्यात आली आहे. विठ्ठल सभा मंडप, बाजीराव पडसाळी, हनुमान गेट आदी ठिकाणी राहिलेली किरकोळ कामे सुरु आहेत. ही कामेही 30 जून पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहेत.
आषाढी यात्रा सोहळ्यात शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री मंदिरातील विठ्ठल सभामंडप येथे उपस्थित वारकरी, भाविकांना मार्गदर्शन करतात. येथेच मुख्यमंत्री व उपस्थित मंत्र्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत असतो. त्या विठ्ठल सभामंडपाचे देखील काम पुर्ण होत आले आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात, दरवाजावर तसेच खांबांवर बसवण्यात आलेली चांदी काढण्यात आली आहे. अनेक ठिकाणची ग्रॅनाईट फरशी काढून त्या ठिकाणी दगडी फरशी बसवण्यात आली आहे. हे देखील काम पुर्णत्वास आले आहे. खांबावरील चांदी काढण्यात आल्याने खांबावर कोरण्यात आलेले अभंग, संदेश भाविकांना वाचता, पाहता येत आहेत. तसेच खांबांवर नक्षीकामातून देवदेवतांचे दर्शनही घडत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी येताच त्यांना सातशे वर्षापुर्वीच्या मंदिराचा अनुभव येणार आहे.