

सोलापूर : दौंडसह परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे दोन वंदे भारत या रेल्वे गाड्यांना नवीन रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यास रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी दिली आहे.
सोलापूर मुंबई या दरम्यान धावणार्या गाडीला दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. रेल्वे मंडळाने संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांच्या सहीने निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाचा निर्णय गेल्या 30 सप्टेंबर रोजी घेतला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा निर्णय प्रायोगिक स्वरूपात घेतला असून प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्यास हे थांबे कायमस्वरूपी केला जाण्याचा विचार केला जाईल. सध्या, मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी 4:05 वाजता सुटते. दादर, ठाणे, कल्याण आणि पुणे अशा स्थानकांवर थांबत थांबत ही गाडी रात्री 10:40 वाजता सोलापूरला पोहोचते. या नव्या आदेशानुसार या प्रवासात दौंड हा महत्त्वाचा थांबा म्हणून समाविष्ट होईल.
हा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आली आहे. येथील थांब्याची मागणी जुनीच आहे. याचा आता निर्णय झाला असून हा थांबा कधीपासून सुरू होईल, याबाबत रेल्वेच्या वरिषठ कार्यालयाकडून स्पष्ट अद्याप सूचना नाहीत, असे वरिष्ठ मंडल व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस क्रमांक 20669 व 20670 या गाडीला यापुढील काळात किर्लोस्करवाडीला थांबा दिला आहे. तर सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस 22225 व 22226 या वंदे भारत गाडीला दौंड येथील स्थानकावर थांबा मिळाला आहे. या नव्या बदलांची अंमलबजावणी सुरू असून प्रवाशांना लवकरच या नवीन थांब्यांचा फायदा होणार आहे.