

भीमानगर : सध्या उजनीतून सोडल्या जाणार्या पाण्यामुळे जलाशयाचा काठ उघडा पडून स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांना मुबलक खाद्यान्न उपलब्ध होईल व येत्या काही दिवसांत पक्ष्यांची गर्दी वाढेल, असा अंदाज उजनी परिक्रमा करणारे पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्याची क्षमता वाढल्यामुळे पक्ष्यांचा चराऊ भाग लवकरच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच पूर्णपणे पाण्याने झाकला होता. सतत पडणारा पाऊस व लांबलेला पावसाळा या कारणांमुळे जलाशयाच्या काठावर खाद्यान्नाचा तुटवडा जाणवत होता. विशेष करून पाण्याच्या काठावर चरणारे करकोचा वर्गातील पक्षी खाद्यापासून वंचित झाले होते. आता विविध प्रकारचे करकोचे पाणलोट क्षेत्रात गर्दी करतील, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठे जलस्थान ठरलेल्या उजनी धरण गेले तीन महिने काठोकाठ भरून वाहत असल्यामुळे पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्यात बुडाला होता. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होत नव्हते. अन्नाच्या शोधात पक्षी जिल्ह्यातील अन्य छोटे-मोठे तलाव, पाणवठे व शेतशिवारातील तालीत विखुरलेले होते. आता धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षी धरणावर गर्दी करतील.
- डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक
उजनी धरणातून सोलापूरला पाणी सोडल्याने सोलापूरकर आनंदित झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध पक्षीही आनंद घेतील. विविध पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनी धरणावर येत्या काही दिवसांत अनेक प्रकारचे पक्षी गर्दी करतील. पक्षी निरीक्षकही गर्दी करतील.
- कल्याणराव साळुंखे, पक्षी निरीक्षक