

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत 3000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर येथील भीमा नदीत उजनीचे पाणी येण्यास पाच दिवस लागण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.
16 एप्रिल रोजी उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुरुवारपासून (दि. 23) उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे भीमा नदीतील पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. नदी कोरडी झाल्याने नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे उजनीतून तत्काळ पाणी सोडण्याचा निर्णय उजनी कालवा सल्लागार बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरुवातीला चौदाशे क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर 3000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मात्र हे पाणी अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.