

हंजगी : उजनी धरणातून सोडलेले पाणी हे हिळ्ळी व खानापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहचल्याने हिळ्ळी व खानापूर बंधारा कोरडाठाक पडला होता. याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केले होते. याची दखल घेत प्रशासनानी आता हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून स्वागत होत आहे.
हिळ्ळी व खानापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यासाठी मागच्या पाच-सहा दिवसांपासून हलचाल सुरु होता. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व सामान्य नागरिक हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यासाठी अंदोलनाच्या तयारी होते. याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे -पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उजनी धरणातून पाणी खाली हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार आता अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यात आल्याने अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुर तालुक्यातील शेतकरी सुखावले गेले आहेत. याचा फायदा आता अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांना होणार आहे.या शेतकरी हिताच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.