

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी विसर्गात वाढ करत तो 6 हजार क्युसेकने करण्यात आला आहे. या पाण्याने उजनी धरणाखालील टेल एंड हिळ्ळी बंधारापर्यंतचे 23 बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी 272 किलोमीटर अंतराचा प्रवास उजनीतील पाण्याला करावा लागणार आहे.
दरवर्षी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडले जाते होते. परंतु, मागील सहा महिन्यांपूर्वी उजनी ते सोलापूर समातंर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने औज, चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडणे बंद झाले आहेत. त्यामुळे भीमा नदी ही कोरडीठाक पडली आहे. पाण्याअभावी पिके करपून जात आहे. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती.
16 एप्रिल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानूसार गुरुवारी दि.23 एप्रिलपासून रात्री 9 वाजलेपासून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला.