

पिलीव : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ब्रह्मचैतन्य हॉटेलसमोर दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक होवून दोघांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 26) घडली. मृतांमध्ये एक सुळेवाडी (ता. माळशिरस) येथील तर दुसरा खडकी (ता. माण) येथील आहे.
पिलीववरून राजवर्धन बापू शिरतोडे (वय 18) हे दुचाकीवरून (एम.एच 11 सी ई 5828) खडकी (ता.माण, जि. सातारा) गावाकडे जात होते. तर सुळेवाडी गावाकडून दुचाकीवरून (एम.एच.45 ए जी 6790) स्वप्नील शिंगू सुळे (वय 18), साईराज सत्यवान सुळे (वय 18) व गणेश रामचंद्र माने (वय 18) हे तिघे येत होते.
ते पिलीव नजीक ब्रह्मचैतन्य हॉटेलसमोर चारचाकीला ओव्हरटेक कताना समोरून येणाऱ्या राजवर्धन यांच्या दुचाकीला धडकले. यामध्ये जखमी राजवर्धन शिरतोडे याचा अकलूज येथे दवाखान्यात नेत असतानाच वेळापूरजवळ मृत्यू झाला. तर स्वप्नील सुळेचा अकलूज येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील साईराज सुळे याचा पाय मोडला. तर गणेश माने गंभीर जखमी झाला. दोघांवरही अकलूज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.
वाढदिवसाऐवजी अंत्यसंस्कार
स्वप्नील सुळे, साईराज सुळे व गणेश माने हे तिघेजण सुळेवाडी गावातील आहेत. ते म्हसवड येथे बारावीत शिकत आहेत. सध्या बारावीची परीक्षा अंतीम टप्प्यात आहे. पुढे ते एम.एच.सीईटीची परीक्षा देऊन पुढे शिक्षण घेण्यासाठी तयारी करीत होते. आपला मित्र मयत स्वप्नील याचा 27 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होते. असे असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. वाढदिवस साजरा करण्याऐवजी अंत्यसंस्कार करण्याची वेळ स्वप्नील च्या कुटुंबावर आली आहे. मयत स्वप्नील सुळे याचे अकलूज येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.