

सोलापूर : उजनी धरणाच्या पाण्यावर होणारा १४ हजार ९७६ कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खासगी ठेका रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि.१२) मोर्चा काढला.
उजनी जलाशयाचा पाणीसाठा तीस हजार हेक्टर आहे. धरणाच्या सभोवतालच्या परिसरातील हजारो मच्छिमार, अडतदार, व्यापारी यांची उपजीविका मत्स्य व्यवसायावरच अवलंबून आहे. नुकतेच राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मच्छिमारांचे जीवनमान उंचवावे असे वाटत असताना उजनी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खासगी ठेका देण्याचा घाट शासनाने घाटला आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खासगी ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी प्रमुख मागणीसाठी इंदापूर, दौंड, माढा आणि करमाळा तालुक्यातील मच्छिमार, व्यापारी, अडतदार यांनी मोर्चा काढला आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार नगरे, राजेंद्र नगरे, पप्पू सल्ले, सिताराम नगरे आदी उपस्थित होते.
महिलांची मोठी गर्दी
उजनी धरणाच्या पाण्यावर होणारा सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खासगी ठेका रद्द करावा, या मागणीसाठी मच्छिमार करणाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
अजित दादा परत या..
दरवर्षी जिल्हा नियोजनमधून मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी अजित पवार हे दोन कोटी रुपये देत होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना कोणी वाली राहिला नसून, अजित दादा परत या.., असे फलक आंदोलनावेळी दिसले.