

सोलापूर : सोलापूरची जीवनदायिनी समजले जाणारे उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील एकूण साठा ११५.७० टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ५२.४ टक्के झाला होता. पाणी पातळी ९७.७९ टक्के आहे. जलसाठ्यात येणारे पाणी तितक्याच वेगाने सांडव्याद्वारे पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरण आजच शंभर टक्के भरल्यात जमा आहे.
दरम्यान, धरणात पुरेसे पाणी आल्याने भीमा, सीना नदी काठ आणि कालव्यावरील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. सायंकाळी दौंड येथून उजनी धरणात ७०,९८९ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. धरणाची भराव क्षमता ११७ टीएमसी आहे.
उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता २० हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. त्यातच हवामान विभागाने भीमा खोऱ्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उजनी धरण पूर्ण भरल्यानंतरही पाण्याची आवक कायम राहण्याची शक्यता आहे.
वीर धरणातून नीरा नदीत सकाळी २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. हे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचल्याने पंढरपूर येथील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, वीर धरणातून विसर्ग कमी करून तो पाच हजार ८६२ करण्यात आला.