Solapur News | बिले जमा करण्यास दोन दिवसांची मुदत
सोलापूर : जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या उसाची सुमारे 84 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. त्या कारखान्यांनी 31 जुलैपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिले होते. बिले जमा न करणार्या कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. तसे संकेत पुणे प्रादेशिक साखर कार्यालयाने दिले आहे.
जुलै संपत असला तरी डिसेंबर 2024 मधील उसाची रक्कम अद्याप शेतकर्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी शेतकर्यांचे 84 कोटी रुपयांची रक्कम थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या आदेशानंतर जय हिंद शुगर, सिद्धेश्वर सहकारी आणि गोकूळ शुगरसह अनेक कारखानदारांनी किरकोळ रक्कम शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे.
मात्र, अद्यापही बरीच रक्कम जमा करणे बाकी आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असण्याचा बिरुद मिळवणार्या सोलापूर जिल्ह्याने आणखी एक विक्रम केला आहे. हंगामात सर्वात जास्त शेतकर्यांची रक्कम थकवण्यामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शेतकर्यांच्या उसाची रक्कम देणे आणि त्यानंतर शेतकर्यांच्या उसाचे पैसे थकवणे असा नवीन प्रयोग जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी सुरू केला आहे. त्याचा शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे.
निगरगट्ट यंत्रणेमुळे बिले मिळण्यास विलंब
हंगाम संपून सहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील शेतकर्यांना उसाच्या पैशासाठी कारखानदारांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. याबाबत शेतकरी संघटना वारंवार निवेदने तसेच आंदोलने करत आहेत; मात्र निगरगट्ट झालेली यंत्रणा त्यांना दाद देत नाही.

