

रवि शिरढोणे
अकलूज : श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पायी प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष वैष्णवासाठी प्रवासात दुर्दैवाने अपघाती किंवा हृदयविकारासारख्या अनपेक्षित कारणामुळे निधन झाले, तर त्या वारकऱ्याच्या कुटुंबाला श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, ही मदत दुःखाची भरपाई नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून आणि वारकरी कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीतून उचललेले एक छोटेसे पाऊल आहे. वैष्णवांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुरेसे पाणी व वेळेवर अन्न घ्यावे, थकवा जाणवल्यास विश्रांती घ्यावी आणि कोणतीही आरोग्यविषयक अडचण जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय पथकाशी संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या आर्थिक मदतीसाठी संस्थानने पुरुष किंवा महिला वारकरी हे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या दिंडीतील असावेत. व सदरची दिंडी संस्थांकडे नोंदणीकृत असावी यासह संस्थांचे काही नियम व अटी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.