

पंढरपूर : उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने वाखरी पालखी तळावर आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर फोडून ऊस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऊसदर सरकारने जाहीर करावा अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर महिला आंदोलन करतील, असा इशारा आंदोलकांच्या पत्नींनी दिला आहे. त्यामुळे ऊसदर आंदोलन चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे.
तिसऱ्या दिवशी खर्डी येथील सीताराम कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. तर शुक्रवार, दि. 12 रोजी चौथ्या दिवशी श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्यावर गव्हाणीत उतरत आंदोलन करण्यात आले. सुमारे पाच तास कारखान्याचे गाळप बंद पाडले. तर सकाळी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आंदोलनाची चांगलीच धास्ती घेतली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी समाधान फाटे व इतर तीन आंदोलकांची तब्येत बिघडत चालली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनस्थळी भेट देत टाहो फोडला. समाधान फाटे यांच्या मुलीने सरकारला विनंती केली आहे की, लवकरात लवकर ऊसदराचा तोडगा काढा आणि माझ्या वडिलांना वाचवा, असे आवाहन केले आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.