भिमानगर : माढा तालुक्यात महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूलचे तलाठी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांचे डबल पंचनामे केले आहेत. या पंचनाम्याच्या माध्यमातून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची उघड झाले आहे. त्यामुळे दुप्पट नुकसान भरपाई आलेल्या शेतकऱ्यांनी पैसे परत भरावेत म्हणून तहसीलदार माढा यांनी पत्रक काढले आहे.
माढा तालुक्यात सन 2022 मध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे खूप नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, म्हणून शासनाने तात्काळ निर्णय दिला होता. त्या निर्णयाच्या आधारे महसूल विभागाचे तलाठी व कर्मचारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाच्या पंचनामे करण्यात दिरंगाई दाखवली. याबरोबरच ओळखीत असलेल्या शेतकऱ्यांचे डबल पंचनामे करुन शासनाची फसवणुक केली आहे. ज्या महसूल कर्मचाऱ्यांवर नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे जबाबदारी दिली. त्याच कर्मचाऱ्यांनी शासनाची मोठी फसवणूक करून आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना वाढीव लाखो रुपयाची नुकसान भरपाई मिळवून. दिली व त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक थोडी केली असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे. म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले म्हणण्याची वेळ आली आहे.
या धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी तात्काळ तहसीलदार यांना डबल गेलेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करावी असे पत्रक काढले. या पत्राच्या आधारे तहसीलदार माढा यांनी डबल नुकसान भरपाई गेलेल्या शेतकऱ्यांना पत्र काढून डबल आलेली रक्कम तात्काळ परत भरावी, अन्यथा आपल्या सातबारा उताऱ्यावरती बोजा चडवण्यात येईल असे पत्र काढले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती डबल नुकसान भरपाई जमा झाली आहे. असे शेतकरी ज्यादा आलेली रक्कम परत भरतील, न भरणाऱ्यांच्या उतार्यावरती बोजा चडवण्यात येतील. परंतु जाणून बुजून चुकीचे पंचनामे करून शासनाचे लाखो रुपयाची रक्कम दिशाभूल करून शेतकऱ्यांच्या नावावरती पाठवून मोठ्या प्रमाणात आर्थिक तोडी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणार का? की वरिष्ठ अधिकारी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार याची उत्सुकता जनतेला लागून राहिले आहे.