

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्यास सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढे दर सोमवारी अध्यक्ष दीपक वैद्य हे बार्शी येथून एस. टी. बसने तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे सोलापूर शहरातून सायकलवर जिल्हा परिषदेत येणार आहेत.
तसेच जिल्हा परिषदेत दर सोमवारी इंधन बचत दिन पाळला जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी शक्यतो सायकल, सार्वजनिक वाहतूक सेवा किंवा सामायिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांनी केले.
इंधन बचत उपक्रमांतर्गत स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य हे दर सोमवारी एसटी बसने प्रवास करून किंवा रविवारी यशवंतनगर येथील रेस्ट हाऊस येथे मुक्काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
देशात वाढते इंधन दर, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण या पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली आहे. याच विचारातून जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे. छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो, असे अध्यक्ष वैद्य यांनी स्पष्ट केले.