

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व विनंती बदल्या काही दिवसांसाठी पुढे गेल्या आहेत. बदल्यावेळी कोणाच्या बदल्या होणार अन् कोण मुख्यालयात ठाण मांडून राहणार याच्या चर्चा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात होत आहेत.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मंगळवारी (दि. 5) बदल्या होणार होत्या. मात्र, तो कार्यक्रम बारा मे व तेरा मेपर्यंत पुढे गेला आहे. अर्थ विभागातील कर्मचारी व चालकांच्याही बदल्या करण्याची मागणी होत असल्याने बदल्या पुढे गेल्याची चर्चा आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. कार्यालय व विभागात बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्यांना इतर विभागात बदली देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांच्या होणार का बदल्या?
प्रशासन विभागाने बदली कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, यातून पुन्हा अर्थ विभाग व बदली व प्रमोशन घेऊन बेकायदा मुख्यालयात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याची चर्चा आहे. अशा कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी माहिती घेऊन त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे.
चालकांना कधी मिळणार न्याय?
जिल्हा परिषदेत गेल्या दहा वर्षांपासून चालकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चालकांच्याही बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.