

सोलापूर : गेल्या काहीं दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई हवामान विभागाच्या वेध शाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.
यंदा जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक पडल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. विहिरी, बोअरवेल आणि लघू जलस्रोतांची पाणी पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबरच्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, किरकोळ सरी न पडता समाधानकारक मोठा पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना कितपत दिलासा मिळतो, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.