

सोलापूर : ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष यांची सांगड घालत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पुन्हा एकदा आपल्या संशोधन क्षमतेची छाप राष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे. संस्थेच्या नावावर ग्रॅव्हिटी-ड्रिव्हन ऑटोनॉमस सोलर पॅनेल ओरिएंटेशन सिस्टीम विदाऊट इलेक्ट्रिकल कॉम्पोनन्टस् या अभिनव आणि पर्यावरणपूरक संकल्पनेसाठी अधिकृत पेटंट दाखल झाला आहे.
सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूर्याच्या दिशेनुसार सौर पॅनेल फिरवणे ही आजची गरज आहे. मात्र, सध्या वापरल्या जाणाऱ्या प्रणालींमध्ये विद्युत मोटर्स, सेन्सर्स, कंट्रोल सिस्टीम्स आणि सतत ऊर्जेची आवश्यकता भासते. यामुळे खर्च, देखभाल आणि तांत्रिक गुंतागुंत वाढते. या पार्श्वभूमीवर डब्ल्यू.आय.टी.ने मांडलेली ही संकल्पना अत्यंत वेगळी आणि दूरदृष्टीची आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करून, कोणतेही विद्युत घटक न वापरता सौर पॅनेल आपोआप सूर्याच्या दिशेने वळवणे, ही कल्पना केवळ वैज्ञानिक नव्हे, तर शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरणारी आहे.
या शोधाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे शून्य वीज वापर, कमी देखभाल खर्च, ग्रामीण व दुर्गम भागांसाठी उपयुक्तता, दीर्घकालीन टिकाऊपणा, हरित ऊर्जेला चालना. विद्युत घटकांशिवाय कार्य करणारी ही प्रणाली भविष्यात सौरऊर्जेच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकते. विशेषतः शेतकरी, ग्रामीण व आदिवासी भाग, तसेच विकसनशील देशांसाठी ही प्रणाली वरदान ठरू शकते.
विकास अधिष्ठाता डॉ. श्रीशैलप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. महेश कल्याणशेट्टी, डॉ. भाग्येश देशमुख, डॉ. श्रीकृष्ण गोसावी, प्रा. गोविंद सामलेटी, प्रा. मयूर उबाळे, प्रशांत धनशेट्टी, डॉ. नागेश तंबाके, प्रा. दीपक मसलेकर, प्रा. बिपीन पाटील यांचे योगदान लाभले आहे. या सर्वांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व प्राचार्य डॉ. विजय आठवले आणि प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलेे.