

सोलापूर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यात मान्सूनने दडीच मारली आहे. अल निनोमुळे ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटके बसत असून, सोमवारी (दि. १३ जुलै) तापमान ३७.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे दुपारी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे पाहायला मिळाली.
यंदाच्या उन्हाळा अधिक कडक ठरला होता. कमाल तापमान ४४ अंशांवर पोहोचले होते. जून महिना संपला तरी तापमान ४० अंशांवर राहिले. दरम्यान, जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात तापमानात कमालीचे घट होत ४ जुलै रोजी २९.९ सेल्सिअस इतके तापमान होते. मागील दहा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, ७.१ अंश सेल्सिअस इतकी तापमानात वाढ झाली आहे.
रोहिणी, मृग, आर्द्रा ही तीन्ही नक्षत्रे कोरडे गेले असून, पुरर्वसू नक्षत्रतही निम्मा संपत आला तरी अद्याप पावसाने दडीच मारली आहे. पाण्याअभावी, भीमा, सीना, माण, भोगावती नद्यांचा पात्र कोरडेठाक पडले आहेत. पिके माना टाकत आहेत. शेतातील उभ्या ऊस पिकाचा पाचोळा झाला आहे.
यंदा प्रशासनाने सूमारे ४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामातील पिकांचे पेरणीचे नियोजन केले होते. परंतू केवळ ७० हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरणी झाली आहे. उगवण झालेली पिकेही कडक उन्हामुळे कोमेजून जात आहे. जून महिन्यात सरासरीच्या ८२ टक्के पाऊस पडला असला तरी पेरणीलायक पुरेसा पाऊस झालेला नाही.