

सांगोला : उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांची चिंता असतानाच महावितरणकडून होणाऱ्या वीज भारनियमनाचा शेती पिकाला फटका बसत आहे. पिकाला पाणी वेळेवर पुरविणे कठीण झाले आहे. शिवाय सकाळच्यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने जनावरांच्या धारा मशीनऐवजी हाताने काढाव्या लागत असल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला असल्याची पशुपालक तक्रार करीत आहेत.
चालूवर्षी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. काही भागात तर विहिर, आड व बोअरवेल कोरडे पडले आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पिकांना पाणी कमी पडू नये यासाठी खर्च करून शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचा साठा करून ठेवला आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने उभी पिके पाण्याविना होरपळून निघत आहेत.
प्रामुख्याने डाळींब, ऊस, केळी, बागायतदार शेतकरी महावितरणच्या या कारभारामुळे पुरता हैराण झाला आहे. साठवण करून ठेवलेले पाणी असून देखील केवळ भारनियमनामुळे ते वेळेवर शेती पिकास देता येत नसल्याने उन्हाळ्यात पिके जगविणे मुश्किलेचे झाले आहे. जनावरांना केलेल्या चारा पिकाला देखील पुरेसे पाणी देणे कठीण होऊन बसले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून ग्रामीण भागातील लोडशेडींग कमी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.