

सोलापूर : जुलै महिना संपला असून, पावसाने जिल्ह्यात अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २८ गावे आणि १४६ वाड्या- वस्त्यांवरील जवळपास ८० हजार नागरिकांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील माढा आणि सांगोला तालुक्यात सर्वाधिक टँकर आहेत. त्या खालेखाल करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील काही भागात अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने १७ विहिरी आणि सहा बोअर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अधिग्रहण केले असून, त्याद्वारे २८ गावे आणि १४६ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळ्यात जून आणि जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. अद्यापही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पुढील काळात टँकरची मागणी वाढणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास टँकरची संख्या कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तालुकानिहाय टँकर
अक्कलकोट : ०१, बार्शी : ०१, करमाळा : ०४, माढा : ०७, मंगळवेढा : ००, माळशिरस : ०४, मोहोळ : ००, उत्तर सोलापूर : ०५, पंढरपूर : ००, दक्षिण सोलापूर : ०३, सांगोला : ०६ असे एकूण ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.