

वैराग : पावसाळ्याला जवळपास अडीच महिने उलटून गेले असतानाही बार्शी तालुक्यासह वैराग भागातील दहिटणे, मुंगशी, सासुरे, राळेरास, शेळगाव, तडवळे, यावली, ढोराळे, इर्ले आदी गावांत अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर रोटर फिरवला आहे त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.
दमदार पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी उशिराने खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतांमध्ये उडीद व सोयाबीनची पिके आता फुलोऱ्यात आली आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून सोयाबीन, मूग, उडीद करपले आहे.
ज्या आभाळाकडे पाहून बळीराजा आपल्या पिकांच्या हिरवाईत सुख शोधत होता, त्याच आभाळाने ऐन पावसाळयात पाठ फिरविली. आता त्याच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतातील उभे पीक तहानेने माना टाकत आहे, बांधावरचे हिरवे गवत वाळत आहे आणि गोठयातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. पाणी पातळीही दिवसेंदिवस घटत चालल्यामुळे दुष्काळाची तीव्रता पावसाळ्यातच भीषण बनू लागली आहे. त्यामुळे सिंचनासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे बार्शी तालुक्यातील बळीराजाच्या काळजाला छेद देत आहे.
पावसाअभावी विहिरी, नद्या-नाले आणि जलसाठ्यांवरही परिणाम होत असून पाणीपातळी घटत चालली आहे. ग्रामीण भागात सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. काही भागांत शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येत आहे. बार्शी तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतीचा तातडीने दौरा करून पिकांची पाहणी करावी, पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीक विमा, नुकसानभरपाई तसेच दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यातअशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यां मधून होत आहे.