

सोलापूर : सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असलेले उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने तिसऱ्यांदा गाळाचे सर्वेक्षण करण्यासाठी 51 लाख 51 हजार रुपयांची निविदा मागवण्यात आलेली आहे. परंतु नुसते सर्वेक्षणाचेच काम सुरू असून, प्रत्यक्षात गाळ काढून पाणी साठा कधी वाढणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
उजनी धरण व्यवस्थान विभाग हे जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळांमार्फत देखभाल व दुरुस्ती करत असते. या आधी उजनीतील गाळाचे नााशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) 2002 आणि 2007 मध्ये सर्वेक्षण करुन दिलेल्या अहवालानुसार उजनी धरणात 12.77 टक्के इतका गाळ होता. त्यानंतर पुन्हा केंद्रीय जल अयोगाने 2011 साली विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या पाहणीत उजनीतील गाळाचे प्रमाण 27.94 टक्क्यांवर गेले असल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा सन 2024 मध्येही उजनी धरणातील गाळ काढण्यासंदर्भात मुद्दा समोर आला. परंतु ठोस भूमिका अद्याप जलसंपदा विभागाने घेतलेली नाही.
यापूर्वी जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उजनी धरणात गाळ साठण्यात आल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. गाळ काढण्यास उजनीतील पाणी साठवणूक क्षमता वाढून लातूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.