

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या आडनावात, जन्म तारखेत चूक, वडिलांच्या नावात चूक तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसल्याने राज्यातील तीन लाख विद्यार्थी आधारविना आहेत. त्यामुळे जवळपास तीन हजार शिक्षक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट न झाल्याने शिक्षकांनाच फेल करण्याची अफलातून संचमान्यता शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. त्यामुळे तीन हजार शिक्षकांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत. मुलांचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. मात्र राज्यात कुठे मुलांचे ठसे जुळत नाहीत, कुठे नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर कुठे जन्मतारीख जुळत नाही. त्यामुळे आधार असूनही लाखो विद्यार्थी निराधार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्यात चूक झाली असेल तर त्याप्रमाणे आधार कार्ड नोंदणी होते. जन्मदाखला शाळेत दुरुस्ती करता येते नाही. चुकीचे आधार संचमान्यतेत ग्राह्य होत नसल्याने आधार अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्याची शासनाने दखल घेण्याची मागणी शिक्षकांतून होत आहे. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांतून होत आहे.
राज्यात हजारो विद्यार्थ्यांच्या जन्मतारीखा, बोटाचे ठसे किंवा त्यांचे चुकीचे फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. ही दुरुस्ती झाल्यावरच संचमान्यता दुरुस्ती होणार आहे. संच मान्यता दुरुस्तीनंतर अनेक शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.