

बार्शी : तालुक्यातील आगळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी सौर पंप, विहीर व बोअरवेलवरील कॉपर केबल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे १५ ते १६ शेतकऱ्यांचे अंदाजे २५०० मीटर केबल चोरीला गेल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.
ही घटना गावातील उकिरडे वस्ती, उकिरडे डीपी नं. २ डिपी आणि मोरे डिपी परिसरात घडली. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील सौर ऊर्जा यंत्रणा आणि बोअरवेलच्या मोटारींना जोडलेल्या कॉपर केबल कापून नेल्या. सकाळी शेतात गेल्यानंतर शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली. याप्रकरणी शेतकरी राजकुमार मांगलकर आणि शशिकांत पवार यांनी बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन, येथे लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, चोरीला गेलेल्या केबलमुळे शेतातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.
दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये राजकुमार मांगलकर,शरद उकिरडे ,अनिल गटकळ, नागनाथ गटकळ, वसंत गटकळ,विश्वनाथ गटकळ, हनुमंत गटकळ,, नाना गटकळ, तानाजी उकिरडे ,सुधाकर उकिरडे, प्रकाश उकिरडे, अमोल उकिरडे ,सतीश उकिरडे ,सतीश शिंदे, दत्तात्रय शिंदे, वसंत दरपे आदी शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे
सध्या रब्बी हंगामाच्या तोंडावर पाण्याची गरज असताना ही चोरी झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार अशा घटना घडत असूनही चोरटे अद्याप तालुका पोलिसाना सापडले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केबलमधील कॉपर काढून त्याची विक्री केली जाते. यामुळे केबल चोरीच्या घटना वाढताना दिसून येतात. मात्र चोरी प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पिकाच्या वाढीवेळी पाणी देण्याची गरज असते.मात्र पंप बंद राहिल्याने नुकसान होते.
या घटनेमुळे आगळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी होत आहे.