

सोलापूर : मे महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेचा तडाखा कायम असून तापमानाचा पारा उतरायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर असल्याने नागरिक अक्षरशः घामेघूम झाले आहेत. शनिवार, दि. 30 मे रोजी 40.4 अंश सेल्सिअस इतका कमाल तापमानाची नोंद झाली.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरडी हवा वाहत असल्याने उष्णता अधिक असह्य होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे कठीण बनले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रस्त्यावर काम करणारे कामगार यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि रस्त्यांवर दुपारच्या वेळी नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेये, सरबत, उसाचा रस तसेच फळांचा आधार घेत आहेत. अनेक ठिकाणी लिंबूपाणी आणि शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नसून वातावरण उष्णच राहणार आहे.