

सोलापूर : केंद्र सरकारने कारखान्यांकडील साखरेच्या काळा बाजार, तसेच वाहतुकीची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्याच सार्वजनिक अन्नधान्य वितरण विभागाचे अधिकारी व राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक ही चौकशी करणार आहे.
साखरेचे भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. यावर मलमपट्टी म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. साखर कारखाने आपल्याकडील साखर साठा लपवत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच वाढलेल्या साखरेच्या किमतीबाबत कारखानदार, साठेबाज आणि व्यापाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. याबाबत या पथकाकडून चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.
साखरेचे 'मुंगळे' बाहेर येण्याची शक्यता
जिल्ह्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. या कारखान्यांकडून प्रादेशिक कार्यालयाला साखर उत्पादनाची आकडेवारी देताना टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. साखर कारखानदार प्रादेशिक कार्यालयाला जुमानत नाहीत. त्यामुळे पथकाकडून चौकशी झाल्यास यातून सध्या साखरेला लागलेले 'मुंगळे' कोण आहेत, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.