

सोलापूर : महावितरणने प्रधानमंत्री सूर्य घर वीज योजनेसाठी लागू केलेल्या नव्या नियमांच्या विरोधात सोलर असोसिएशन ऑफ सोलापूरने गुरुवारी मोर्चा काढून विरोध दर्शविला. चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. सेवासदन प्रशाला, रामलाल चौक, नवी वेस पोलिस चौकी मार्गे जुनी मिल कंपाऊड येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन महाविरणचे अधिक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे सुर्पूद केले.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सौर प्रकल्पांच्या क्षमतेबाबत महाविरणने नवा नियम लागू केला आहे. 13 फेबु्रवारीपासून ग्राहकांच्या मागणीनुसार सोलार प्रकल्पाची क्षमता मंजूर केली जाणार नसून मागील 12 महिन्यांच्या सरासरी सरासरी वीज वापरावर आधारीतच सोलार प्रकल्पाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे सोलार विक्रेते आणि उद्योजकांसह ग्राहकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणने केंद्र सरकारने जाहीर केलेले योजनेचे नियम मोडीत काढून मागील 12 महिन्याच्या वीज वापरावर आधारित परवानगी देण्याबाबत घेतलेला निर्णय हा अन्यायकारक असल्याचे सोलर विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या मोर्चेत सोलापूर असोसिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष गिरीश तिवारी, उपाध्यक्ष बाबुलाल शेख, सचिव शशिकांत जमादार, खजिनदार स्वप्नील वेर्णेकर, गुरुराज कुलकर्णी यांच्यासह सोलर विक्रेते सहभागी झाले होते.