

सोलापूर ः शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याने त्रस्त जनतेच्या भावना व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकासमोर सोमवारी (दि. 11) मटका फोडो आंदोलन केले.
शहरात ऐन उन्हाळ्यात सध्या अनेक भागात सात दिवसांतून एकदा पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे मटका फोडो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास पुन्हा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महापालिका नागरिकांकडून वर्षाची पाणीपट्टी वसुली करते. मात्र, आठवड्यातून फक्त एकदाच पाणी देते. ते पाणीही अशुद्ध असल्याने शहरातील नागरिकांच्या पोटाचे आजार वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेने दोन ते तीन दिवसाआड व शुद्ध पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर, महेश धाराशिवकर, दत्ता माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती, मंगल थोरात, सायरा मुलाणी उपस्थित होत्या.
सत्ता आल्यास दिवसाआड पाणी देणार होते
महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यास एकदिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते. आता सत्ता येऊनही आठ दिवसाआड पाणी येत आहे. खोटे आश्वासनाने पालकमंत्र्यांनी नागरिकांची मते घेतली. निवडून आलेल्या 87 पैकी 62 नगरसेवक गद्दार असून, इतर नगरसेवकांचे काहीही चालत नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी केला.