

सोलापूर : सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि श्रीराम स्पोर्टस् क्लबच्या वतीने आयोजित 52 व्या कुमार/कुमारी गट जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रचंड गैरसोय झाल्याचे उघड झाले आहे.
इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत 27 मुलांचे आणि 15 मुलींचे संघ सहभागी झाले होते. सांगोला, करमाळा, अक्कलकोट, मोहोळसह विविध तालुक्यांतून दि. 13 रोजी आलेल्या खेळाडूंसाठी आयोजकांनी निवास, भोजन, नाश्ता किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. पुरेसे आर्थिक पाठबळ नसतानाही निवड चाचणीसाठी आलेल्या या खेळाडूंना दोन वडापाव किंवा भजी खाऊन रात्रीची भूक भागवावी लागली. कडाक्याच्या थंडीत त्यांना मिळेल त्या ठिकाणी रात्र काढावी लागली आणि दुसऱ्या दिवशी ते स्पर्धेसाठी मैदानात उतरले. या गंभीर गैरसोयीबद्दल खेळाडूंनी तक्रार केली असता, कबड्डी असोसिएशनच्या सदस्य सुवर्णा कांबळे यांनी उलट-सुलट उत्तरे दिली. महत्त्वाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत होतकरू खेळाडूंची हेळसांड होत असल्याने असोसिएशनच्या आयोजनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.