

सोलापूर : गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील 889 रस्ते खराब झाले आहेत. त्या रस्त्यांना निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, अद्यापही निधी न मिळाल्याने रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली असून, प्रवाशांचे हाल होत आहेत.
शासनाकडून रस्त्यांसाठी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील रस्ते तसेच असून, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग निधीची वाट पाहत आहे. मात्र, त्यातील काही रस्ते प्रवास करण्यासाठी धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे असे रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गतवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जिल्ह्यातील 889 रस्ते खराब झाले होते. त्याची पाहणी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी तालुका दौरा करुन खराब रस्त्यांची माहिती संकलन केली. त्यातून जिल्ह्यात नऊशे रस्ते खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांना निधी मिळावा, यासाठी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव पाठविला आहे. त्यास आता पाच महिने पूर्ण होत आहेत. अद्यापही शासनाकडून निधी न मिळाल्याने बांधकाम विभाग निधीची वाट पाहत आहे. मात्र, शासनाकडून अद्यापतरी निधी देण्याच्या हालचाली दिसत नसल्याची माहिती समोर आली आहे.