

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथून गोकुळ साखर कारखान्यांकडील थकीत ऊसबिलापोटी धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या नवव्या दिवशी रात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने आंदोलन शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदार दुर्लक्ष करत असल्याचा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
थकीत बिलासाठी धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. याची दखल घेत नसल्याने गुरुवारी (दि. 4) शेतकरी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट ते प्रादेशिक साखर कार्यालयापर्यंत अर्धनग्न आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, पूनम गेट येथे गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, या काळात साखर कारखानदार, प्रादेशिक साखर कारखाना कार्यालयाकडून कोणीही आले नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत असून, यापुढील आंदोलन आक्रमक करण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. तीव्र उन्हात व मध्पेच पडणाऱ्य पावसाची तमा न बाळगता शेतकरी आंदोलन करीत आहेत.
यावेळी अंबादास नरे, बालाजी रजपूत, भीमाशंकर कबाडे, सचिन जवळे, सतिश बिराजदार, मोहन धुमाळ, कल्याण मिटकर, प्रभाकर कबाडे, महेश करर्पे, विनायक पाटील, रमेश नरुटे, महादेव करर्पे, सचिन सपकाळ, सुभाष बावकर, अंकुश जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.