

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २०२४ मधील आंदोलनात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यावेळी बार्शीचे तत्कालीन आ. राजेंद्र राऊत यांनी फडणवीस यांच्या बाजूने भूमिका घेत जरांगेंवर टीका केली.
मराठा समाजाला ऐन विधानसभा निवडणुकीत अंगावर घेतल्याने राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाल्याची चर्चा होती. त्यामुळे राऊत यांना पुन्हा आमदार करण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मराठा आंदोलनाच्या काळात जरांगे यांच्या विरोधात एकही नेता भूमिका घेत नव्हता. जरांगे हे फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत होते. त्यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्या बाजूने रिंगणात उतरत जरांगे यांच्या विरोधात भूमिका रोखठोक मत मांडले. त्याचीच पोचपावती म्हणून भाजपने विधान परिषदेची उमेदवारी राऊत यांना दिल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, या चर्चेबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारीमागील नेमके राजकीय गणित काय, याबाबत उत्सुकता कायम आहे.